माडगूळकरांच्याजवळ स्पृहणीय रचनापाटव आहे. गीतातील भावनामक आशयाला फारसा धक्का न लावता आणि शब्दसौष्ठवाला बळी न देता ते एक परिपूर्ण गीत रचू शकतात.
'चैत्रबना'तील पदे त्यांतील नेमक्या व मोजक्या प्रतिमांनी हृदयास अचूक भिडतात. ही प्रतिमासृष्टी पारंपारिक असली, तरी माडगूळकरांच्या प्रतिभेने त्यांना चित्ताकर्षक मखर करून दिले आहे. संतांच्या आणि शाहिरांच्या प्रतिकांना नि प्रतिमांना 'चैत्रबना'ने विशेष आवडीने अंगावर मिरवले आहे. त्यांच्या चपखल प्रतिमा अनेकदा डोळ्यांना दिसतात, कानांशी वाजतात. नाकांशी गंध उधळतात. इंद्रियसंवेदनांना त्या प्रतिमा जागवतात आणि त्यांवर भावनांची ठळक मुद्रा रेखतात.
शब्दांची निवड, त्यांची गोठवण, अचूक अलंकाररचनेचे चिरेबंद शिल्प, आशयाची पातळी - या सर्व बाबतींत माडगूळकरांची पदे जो संस्कार मनावर करतात. त्याचे वर्णन मी 'अभिजात' या संज्ञेनेच करीन. क्षुद्रपणाचा, कोतेपणाचा नीच पातळाचा अभाव हे माडगूळकरांच्या पदांतील आशयअभिव्यक्तीचे ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणूनच माडगूळकरांच्या कल्पनेचा हा व्यवहार व्यवहारी वाटत नाही; तर तो अंतर्बाह्य कलात्मक वाटतो. मराठी काव्यक्षेत्रात म्हणूनच 'चैत्रबना'ला मानाचे स्थान मिळेल यात शंका वाटत नाही. माडगूळकरांनी मराठी कवितेची सातआठशे वर्षांची विविध रूपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे. 'चैत्रबन' म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.आत्मनिष्ठेवर एकांगी भर देऊन कवितेतून कवीचे व्यक्तिमत्त्व शोधू पाहणारी, "a poem written to particular occassion is less than great' असा आक्रोश करणारी, आशयअभिव्यक्तींच्या अद्वैताचा फसवा मंत्र जपत सुभग रचेनेकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारी आजची आकादमिक काव्यरसिकता काहीही म्हणो; पण सर्वसामान्य मराठी रसिकता “चैत्रबना'त रंगून जाईल. माडगूळकरांना लावण्या फार चांगल्या जमतात व भक्तिपर गीते लिहिताना ते 'संत'च बनतात. गंमत अशी की, या दुहेरी किमयेने ते मराठी काव्यपरंपरेच्या आत्मीय गुणांनाच हात घालतात, आपले पुराणे संस्कार जागवतात, चाळवतात. आपल्याला प्राचीन कवितेचा पुनःप्रत्यय घडवतात. 'चैत्रबनात म्हणून वाचक हरखतो आणि दूरच्या प्रवासाला जाऊन परतण्यास नाखूष असतो.
- प्रा. रा. ग. जाधव